मंत्रालय राज्याच्या सर्वात सुरक्षित आणि संवेदनशील प्रशासकीय इमारतीत चोरीची धक्कादायक घटना घडल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. एका मंत्र्यांच्या केबिनमधून तब्बल 80 हजार रुपये चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मंत्र्यांच्या कॅबिनमध्ये ठेवलेली रोख रक्कम अचानक गायब झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तातडीने प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांना याची माहिती देण्यात आली. मंत्रालयासारख्या उच्च सुरक्षा असलेल्या ठिकाणीच चोरीची घटना घडल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मंत्रालय परिसरात प्रवेशासाठी कडक सुरक्षा तपासणी, ओळखपत्र पडताळणी आणि सीसीटीव्ही देखरेख व्यवस्था असतानाही ही घटना कशी घडली, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. प्राथमिक स्तरावर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असल्याची माहिती समोर आली आहे.
सुरक्षा यंत्रणांकडून मंत्रालयातील कर्मचाऱ्यांची आणि संबंधित व्यक्तींची चौकशी केली जात आहे. तसेच चोरी नेमकी कधी आणि कशा प्रकारे झाली, याचा तपास सुरू आहे.
या घटनेमुळे मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून विरोधकांकडूनही सरकारवर टीका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सामान्य नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या प्रशासनाच्या मुख्यालयातच चोरी झाल्याने ही घटना गंभीर मानली जात आहे.
दरम्यान, तपास पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणामागील नेमके कारण आणि जबाबदार व्यक्तींबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.